भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ट्रेन रुळावरून घसरली आणि मालगाडीची धडक या त्रिपक्षीय रेल्वे अपघातात किमान २०० हुन अधिक लोक ठार झाले तर सुमारे ९०० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. हावडा येथे जाणाऱ्या १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहंगा बाजार येथे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. रुळावरून घसरलेले डबे १२८४१ शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली आणि त्याचे डबेही उलटले. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले आणि मालगाडीही अपघातग्रस्त झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. हावडा पासून सुमारे २५५ किमी अंतरावर असलेल्या बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला, असे त्यांनी सांगितले. या अपघातामुळे रेल्वे मंत्रालयाच्या सुरक्षेचे दावे पुन्हा उघड झाले आहेत. अलीकडेच रेल्वेने आपल्या नव्या प्रणालीद्वारे शून्य अपघाताचा दावा केला होता. यासाठी कवचसह अनेक सुरक्षा तंत्रज्ञान लागू केल्याचा दावा रेल्वेने केला. रेल्वेचा ‘कवच’ फ्लॉप
गेल्या वर्षी रेल्वे मंत्रालयाने ‘कवच’ तंत्रज्ञानाची चाचणी घेतली होती, ज्याचा जोरदार प्रचार करण्यात आला होत. त्यावेळी स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ट्रेनमध्ये होते. कवच हे टक्करविरोधी तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे अपघात शून्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल, असा रेल्वेचा दावा होता. कवच २०२० मध्ये राष्ट्रीय स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली म्हणून स्वीकारण्यात आले होते. कवच हे SIL-४ प्रमाणित तंत्रज्ञान आहे, जी सुरक्षिततेची सर्वोच्च पातळी दर्शवते. हे तंत्रज्ञान मायक्रो प्रोसेसर, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि रेडिओ कम्युनिकेशनच्या माध्यमातून जोडलेले असल्याचा रेल्वेचा दावा आहे. काय आहे रेल्वेची ‘कवच’ प्रणाली
ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवलेल्या यंत्राद्वारे सतत इशारे देत हे तंत्रज्ञान ठराविक अंतरावर त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन दिसल्यास स्वयंचलित ब्रेक लावण्यास सक्षम असल्याचा दावा केला गेला. या तंत्रज्ञानाची चाचणी गेल्या वर्षी रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकराबाद सेक्शनवर घेण्यात आली. गाड्यांची टक्कर रोखणे हा स्वदेशी बनावटीच्या या प्रणालीचा उद्देश असून एकाच रुळावर विशेष म्हणजे २०१२ मध्ये सरकारने ही प्रणाली विकसित करण्याची सुरुवात केली होती आणि २०१४ मध्ये चाचणी सुरू झाली. या प्रणालीचा अत्याधुनिक अवतार सर्वोच्च सुरक्षा आणि विश्वासार्हता मानकांवर ठेवला गेला आहे. अशा स्थितीत आता प्रश्न असा उपस्थित होतो की, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली होती की नाही? जर नाही तर इतक्या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये ती का बसवण्यात आली नाही. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड