तुषार कांबळे (हदगाव प्रतिनिधी)
आदिवासी समाजातील दोन महान क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मौजे कार्ला म. येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही क्रांतीवीरांना भावपूर्ण अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सारिका ताई दीपक डावरे यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. राजेंद्र आसोले, युवा व्याख्याते, लेखक आणि समाजप्रबोधनकार (गोंदिया) होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये विलास चवळी (स.पो.नी., मनाठा), सटवाजी नखाते, श्रीरंग देशमुखे (सरपंच), अंकुश मिरासे (पत्रकार), हेमत नरवाडे, रामराव ढाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्त्यांनी आणि मान्यवरांनी राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या शौर्यपूर्ण आणि संघर्षमय जीवनाचा सविस्तर आढावा घेतला. जल-जंगल-जमीन हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यांच्या बलिदानाचे महत्त्व अधोरेखित करताना आजची पिढी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या विचारांमुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी दिशा लाभली.
यावेळी समाजजागृती, शिक्षणवृद्धी, युवा सक्षमीकरण आणि आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी उपस्थितांना केले. आदिवासी समाजाचे शौर्य, परंपरा आणि स्वाभिमान जपणे हीच राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी विलास चवळी, सपो नि. मनाठा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य पद्धतीने वापर करावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळाले.

प्रमुख वक्ते मा. राजेंद्र आसोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे विचार आचरणात आणावेत.” जल-जंगल-जमीन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानातून आजची पिढी शिकण्यासारखे खूप काही आहे. समाजात एकजूट, शिक्षणाची कास धरून प्रगती, आणि शोषणाविरुद्ध लढण्याची वृत्ती — हे सर्व बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
याच कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर बापूराव टारफे यांनी आपल्या घराचा गृहप्रवेश आदिवासी परंपरेने केल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब खोकले, दशरथ झाडे, भगवान बोथीकर, प्रवीण मुकाडे, दुर्गेश भिसे, गुरुदेव झाडे, विवेक धुमाळे, तिरुपती माहुरे, सिताराम माहुरे, विशाल आम्ले, सुरज आम्ले, ओमकार टारफे, सोमनाथ मुकाडे, शुभम कपाटे, सुनील खोकले, संदीप भिसे उपस्थित होते.












