Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा हेतू पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणं होतं. यामध्ये भारताला मोठं यशही मिळालं आहे. तिन्ही सैन्य दलांच्या डीजींनी रविवारी पत्रकार परिषद घेत भारताने केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. डीजीएमओ (DGMO)राजीव घई यांनी सांगितलं की, 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाी ठार झाले आहेत. यामध्ये कंधार हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदस्सीर अहमद यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं की, भारताने सीमेपार पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारताने फक्त नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या 30 ते 40 जवान आणि अधिकाऱ्यांना ठार केलं आहे.
पुढे ते म्हणाले की, भारताकडून प्रत्युत्तर देताना झालेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांना ढाल म्हणून वापर केला. पण आम्ही कोणत्या नागरी विमानाला लक्ष्य केलं नाही. याउलट पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांचं नुकसान केलं.
सैन्य दलांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूर आणि मुरीकदे मधील दहशतवाद्यांच्या मुख्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामुळे प्रचंड नुकसान झालं. पाकिस्तानने आपल्या लष्कर ठिकाणं आणि एअर स्ट्रीपला छोटे ड्रोन आणि युएव्हीच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने ते अपयशी ठरवले.
सैन्य दलांनी यावेळी सांगितलं की, पाकिस्तानी लष्कराने जवान आमच्या टार्गेटवर नव्हते. आमचा हेतू दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करणं होतं. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला असता, आपल्याकडून चोख उत्तर देण्यात आलं. ज्यामुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालं.
सैन्य दलांनी सांगितलं की, आमचं काम लक्ष्य साधणं होतं, जे आम्ही चांगल्या पद्धतीने केलं. मृतदेह मोजणं आमचं काम नाही. ऑपरेशनदरम्यान पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले.
हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल अवधेश कुमार भारती म्हणाले की, 8 मे रोजी भारतीय हवाई दलाने पाळत ठेवणाऱ्या लाहोरमधील पाकिस्तानी रडार साइट्सना लक्ष्य केले. ही कारवाई आमच्याकडून सुनियोजित प्रत्युत्तर होती, त्यानंतरही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरूच राहिले, जे आम्ही पूर्णपणे हाणून पाडले. ते म्हणाले की, पाकिस्तानी ड्रोन आणि इतर यूएव्हींनी एकाच वेळी अनेक भारतीय हवाई तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली आधीच तयार होत्या आणि त्यांनी सर्व हल्ले हाणून पाडले.