नाशिक दि.१५ फेब्रुवारी: नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर बोलताना भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, “मला हे समजत नाही की रोज फक्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचीच चर्चा का होत आहे? जर विलीनीकरण करायचे असेल, तर ते आजही होऊ शकते किंवा दोन महिन्यांनीही होऊ शकते. त्यासाठी आताच एवढी घाई करण्याचे नेमके कारण काय आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
विलीनीकरणाच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना भुजबळ यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय घाईगडबडीत घेण्यासारखा नाही. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर आमदार व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करूनच विलीनीकरणाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार विराजमान आहेत आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा आम्ही त्यांचीच निवड करणार आहोत, असे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करतील आणि दोन्ही बाजूंच्या लोकांशी संवाद साधूनच मोठे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना टोलाही लगावला. ते म्हणाले की, “जेव्हा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आली की शपथविधीची खूप घाई केली गेली. मग आता विलीनीकरणासाठी तुम्ही एवढी घाई कशासाठी करत आहात?” नवीन नेतृत्व आले आहे, त्यांना काम करू द्या, सध्यातरी विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी प्राधान्याचा नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
याच पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणावरही भाष्य केले. नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला लाच घेताना अटक झाल्यानंतर झिरवळ अडचणीत आले आहेत. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, हे प्रकरण आता पोलिसांकडे गेले आहे आणि पोलीस याची सखोल चौकशी करतील. गृहविभाग, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणात किती तथ्य आहे, याची माहिती घेतील आणि त्यानंतरच योग्य तो निष्कर्ष काढता येईल. “जर मी दोषी आढळलो तर राजीनामा देईन,” असे जर झिरवळ यांनी म्हटले असेल, तर त्यात काहीच चुकीचे नाही. मंत्रालयात अनेक लोक काम करत असतात, त्यातील कोणी काय केले आणि त्याचा कोणाशी संबंध आहे, हे पोलीस तपासातच स्पष्ट होईल, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













