डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्चारले कि थेट डोळ्यासमोर येतं भारतीय संविधान. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत एवढं शिकवलं जातं शाळा महाविद्यालयातुन पण यापलीकडे जे त्यांचं मानव मुक्तीचं कार्य आहे. त्यांची सामाजिक, शैक्षणिक व राजकीय चळवळ आहे. विविध क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान युवकांच्या समोर येतच नाही. किंबहुना ते येऊ दिलं जात नाही. त्यामुळे युवकांना शाळेच्या बाहेर बसुन शिकलेले, समाजासाठी जगलेले,पिण्याच्या पाण्यासाठी लढलेले व समतेसाठी व्यवस्थेशी भिडलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युवकांना समजत नाहीत. त्यांचा शिक्षणविषयक संदेश आम्हाला फक्त “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” एवढा मंत्र सांगितल्यागत सांगितल्या जातो. पण शिका म्हणजे काय शिका? हे समजून सांगितले जात नाही.
या स्पर्धेच्या युगात काय शिकावं? आणि का शिकावं? याची उत्तरे आपल्याकडे स्पष्टपणे असायला हवी. जसे आपण परंपरागत व्यवसाय करत होतो तसे परंपरागत शिक्षण घेत गेलो तर आपण या स्पर्धेत टिकु शकणार नाही. जगाची मागणी ओळखुन किंवा किमान समाजातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घेणे गरजेचे आहे. कोणी अर्धवट विद्वान म्हणेल बाबासाहेबांनी काही पोट भरण्यासाठी किंवा नोकरीसाठी शिकायला नव्हतं सांगितलं तर शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो आणि विकसित बुद्धीची लोकं समाजाला दिशा देऊ शकतात. हे म्हणने अगदी योग्य आहे पण माझ्या मते जर एखाद्याचे शिक्षण त्याचा भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नसेल, जे शिक्षण त्याच्या कुटुंबाचे जीवनमान उंचाऊ शकत नसेल ते शिक्षण कधी समाजाला दिशा देईन. समाजाला दिशा द्यायची जबाबदारी शिकलेल्या लोकांवर आहे म्हणून सर्वांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व समाजकार्य या विषयावर संशोधन करणे गरजेचे आहे का? समाजातील प्रत्येक जण समाजाला दिशा द्यायची म्हणून असेच करत राहिला तर दिशा कोणाला देणार? कारण दिशा देण्यासाठी समाजात माणुसच राहणार नाही. सर्वजण समाजाचे दिशादर्शक. असे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नव्हते असे मला वाटते. विविध क्षेत्रात युवकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला पाहिजे. समाजाला फक्त सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढारी यांचीच गरज नसते तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण महत्त्वाचे असतात. हे आंबेडकरी परिप्रेक्षातून युवकांना समजून सांगणे काळाची गरज आहे.
नाहीतर आज आपण पाहतोय समाजाला दिशा देण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्याची दिशा कधी भरकटली हे सुद्धा युवकांच्या लक्षात येत नाही. डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट झालेली तरूण मुलं दोन वेळच्या भाकरीची सोय होईल एवढ्या पगाराची नोकरी शोधत शहराशहरात भटकत आहेत. त्यांच्या आयुष्याचं कोणतं गणित चुकलं हेच लक्षात येत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अगदी मूलगामी व कालसुसंगत आहेत परंतु आपण आजच्या परिस्थितीची आंबेडकरी दृष्टीकोनातून चिकित्सा करायला गल्लत करतो आणि आपल्या आयुष्याचं गणित चुकतं.
मला वाटतं आपण विचारांनी प्रगल्भ झालो. बाबासाहेब आंबेडकरांसह इतर सर्वांनी कोणत्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे हे पान नंबर सहित सांगु शकतो पण त्या विचारांना आजच्या परिस्थितीत कसे उतरवावे किंवा कसे अंगिकारावे हे आपणास समजत नाही.कृतीशिवाय विचारांना अर्थ नाही पण ती कृती ही आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत असायला हवी. अन्यथा काळ त्या कृतीला स्विकारत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे आपल्याला युट्युब किंवा इन्टाग्रामवरून कोण्या बाजारु व्यक्तींकडून प्रेरणा उसनी घ्यायची गरज नाही. फक्त आपण बाबासाहेब आंबेडकर समजुन घेतले पाहिजे. त्यांचे विचार अंगिकारले पाहिजे आणि समाज सुधारण्याचा विचार करण्यापुर्वी आपण व आपले कुटुंब सुधारले पाहिजे. प्रत्येकाने आपण व आपले कुटुंब सुधारले तर समाज आपोआप सुधारेल. आपण हे सर्रास विसरतो कि आपणही समाजाचा भाग आहोत. आपण स्वतः सुधारण्याआधी समाज सुधारण्याचा विचार करतो त्यामुळे ना समाज सुधारतो ना आपलं कुटुंब सुधारतं. समाज सुधारण्यासाठी तरी कोणी दुसरा व्यक्ती येईल पण आपल्याला व आपल्या कुटुंबाला दोन वेळची भाकर द्यायला कोणी येणार नाही. हे गोरगरीब तरुणांनी व युवकांनी समजुन घ्यावे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेऊन आयुष्याची आखणी करावी. माझे स्पष्ट मत आहे त्यांच्या आयुष्याला योग्य आकार नक्की मिळेल.
शेवटी एवढेच वाटते कि,
आंधळ्याची काठी म्हणजे… बाबासाहेब,
अंधार्या वस्तीची ज्योती म्हणजे…बाबासाहेब,
आमच्या जगण्याचे तंत्र… बाबासाहेब,
शोषितांच्या प्रगतीचे होकायंत्र… बाबासाहेब…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना व कार्याला सलाम.
– ॲड.मंगेश गाडगे
( कायदे अभ्यासक,नवी मुंबई)