विजय पाटील | छत्रपती संभाजीनगर दि.२४ | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील २२ जण पहलगाममध्ये होते. सुदैवाने सकाळी ६ लाच ते वैष्णोदेवी दर्शनानासाठी रवाना झाले, तर काही जण ट्यूलिप गार्डन पाहायला गेल्याने सुखरुप राहिले.
२२ एप्रिलला पावसामुळे पहलगाम पाहण्याचा निर्णय आम्ही बदलला आणि ट्यूलिप गार्डन पाहिले. त्यामुळे वाचलो, असे उल्कानगरीतील भास्कर डांगे यांनी सांगितले. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही अलीकडच्या परिसरात होतो. सध्या घटनास्थळापासून शंभर किलोमीटरवर श्रीनगरला सुखरूप आहोत. बाकीचे पर्यटन रद्द करून परतत असल्याची माहिती मोहन पारगावकर यांनी दिली. दरम्यान, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाचे लग्न रविवारी काश्मीरमध्ये पार पडले. लग्नानंतर जलील यांची बहीण आणि भाचे काश्मीर पर्यटनासाठी थांबले होते. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी ते होते. हल्ल्यात ते बचावले आहेत. बुधवारी सुखरुप परतल्याची माहिती
जलील यांनी दिली.
१०० पर्यटकांचा जम्मू-काश्मीर टूर रद्द
शहरातील १०० पर्यटकांनी जम्मू-काश्मीरचा टूर रद्द करून हिमाचल प्रदेशची निवड केली आहे. २५० पेक्षा अधिक पर्यटकांनी त्यांचे नियोजन पुढे ढकलले आहे, अशी माहिती मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबरचे अध्यक्ष जयंत गोरे यांनी पत्रकारांना दिली. शहरातून १५ एप्रिलनंतर पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी जात असतात. पर्यटक आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काश्मीरमधील संपर्क क्रमांक
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
२) व्हॉट्स ॲप : 7006058623, 7780805144, 7780938397
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर