मुंबई दि.३ फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ राजकीय वर्तुळच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. अजितदादांचा करारी आवाज, प्रशासंवरील पकड आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम यांच्या आठवणीत प्रत्येकजण व्याकुळ झालेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता रितेश देशमुख याने शोच्या मंचावर आपल्या लाडक्या ‘दादां’ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना रितेशला अश्रू अनावर झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात करतानाच रितेश देशमुखने आपल्या जड अंतःकरणाने भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “२८ जानेवारीचा सूर्य उगवला, पण तो सोबत सकाळऐवजी एक काळरात्र घेऊन आला. त्या दिवशी मिळालेल्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मी स्वतः आणि अख्खा महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, ही घटना माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्र प्रेमींच्या काळजाला चटका लावणारी आहे. कारण ते केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते आपल्या सर्वांचे हक्काचे आणि लाडके ‘दादा’ होते. आपण सर्वजण जरी त्यांना प्रेमाने अजितदादा म्हणत असू, तरी खऱ्या अर्थाने ते एक ‘बाप माणूस’ होते.”
रितेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पुढे म्हटले, “दादा, आज या मंचावर उभे राहून तुमच्याबद्दल असे बोलावे लागेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तुमच्या आवाजातील जरब आणि नजरेचा धाक समोरच्या व्यक्तीला नि:शब्द करण्याची ताकद ठेवत असे. पण, आज तुमच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा एक दुर्मिळ त्रिवेणी संगम होता. तुमचे ओरडणे किंवा रागावणेसुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे तुमच्या केवळ एका आदेशावर मार्गी लागत असत. म्हणूनच, सामान्य माणसाच्या आयुष्यातील तुम्ही खऱ्या अर्थाने ‘कामाचा माणूस’ होतात. तुमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे तुम्ही सोने केले.”
अजितदादांच्या दिलखुलास आणि मिश्किल स्वभावाचा एक किस्सा सांगताना रितेश म्हणाला, “तुमचा तो अंदाज प्रत्येकाच्या स्मरणात राहील. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याने ‘लव्ह यू’ म्हटल्यावर, ‘अरे, मला काय लव्ह यू म्हणतोस, बायकोला म्हण. म्हणजे आधी स्वतःच्या कुटुंबाकडे बघ आणि मग गावाकडे लक्ष दे’, असा कानमंत्र देणारा माणूस आता आपल्यात उरला नाही. दादा, हे सत्य आहे की तुमची जागा दुसरे कोणीही घेऊ शकणार नाही. कारण राजकारणाची इतकी प्रगल्भ जाण आणि माणुसकीचे भान असलेला तुमच्यासारखा नेता पुन्हा शोधूनही सापडणार नाही.”
शेवटी रितेशने महाराष्ट्राने गमावलेल्या इतर नेत्यांची आठवण काढत म्हटले, “दुर्दैवाने महाराष्ट्रासाठी अहोरात्र झटणारी अनेक ‘बापमाणसं’ काळाने वेळेआधीच हिरावून नेली आणि सर्वांना पोरके केले. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर.आर. पाटील साहेब, प्रमोद महाजन आणि आता तुम्ही… तुम्ही सर्वांनीच एकच धर्म पाळला, तो म्हणजे ‘महाराष्ट्र धर्म’. म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. दादा, तुम्ही कालही आमची प्रेरणा होतात, आजही आहात आणि उद्याही राहाल. हीच प्रेरणा घेऊन मी माझ्या कामाला सुरुवात करतो,” अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.












