नांदेड दि.३: सामाजिक समता, एकात्मता व जातीय भेदभावाच्या निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत प्रभावीपणे राबवली जात आहे. सन २०२४-२५ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील ६८जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला असून, एकूण 34 लाख रुपयांचे अनुदान त्यांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील व्यक्तींनी जर सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन किंवा शीख समाजातील व्यक्तीशी विवाह केला, तर अशा जोडप्यांना प्रति जोडपे ५० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच या घटकांतील अंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही ही योजना लागू आहे.
या योजनेचा उद्देश सामाजिक सलोखा वाढवणे व जातीय भेदभाव दूर करून समानतेचा संस्कार समाजात रूजवणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले आहे.
चौकट
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पती/पत्नीचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला (तहसीलदार यांच्याकडून), शाळा सोडल्याचा दाखला, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस, संयुक्त शपथपत्र, विवाहाचे छायाचित्र, पती व पत्नीचे आधार कार्ड, पती-पत्नीचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत बँक खाते. ही सर्व कागदपत्रे विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहेत.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!