नांदेड,११ जून: गट विकास अधिकारी यांनी आपल्या विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वयाने काम करावे. तसेच विविध योजनांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज दिले.
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभा पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विभागांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आरोग्य अबाधित राहण्यासाठी क्लोरीन (TCL) चा आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्याचे तसेच पाण्याची स्रोत स्वच्छ ठेवण्याचे व नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शंभर टक्के वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक संकलन व संस्थात्मक शौचालये पूर्ण असणाऱ्या गावांना हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याच्या सूचनाही या वेळी सीईओ मेघना कावली यांनी दिल्या.
यावेळी आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, नरेगा, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, कृषी, समाजकल्याण, पाणी पुरवठा, शिक्षण, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, बांधकाम, स्वच्छ भारत मिशन, आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकिला जिल्हातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटक्षिणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची उपस्थिती होती.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!