तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या तरतुदी या विभागमार्फत केल्या जातात आणि त्याचं धर्तीवर सर्व यंत्रणा कार्यान्वित केली जाते, पण ही सर्व यंत्रणा तालुक्यात कायमची ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे.
या विभागाला खीळ बसण्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे असताना मात्र याकडे कानाडोळा केला जातो आहे म्हणूनच हा विभाग नावापुरता आहे की काय…? अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे.तालुक्याचा केदारगुडा परिसरात सामाजिक विभागाच्या वतीने एक रोप वाटिका तयार करण्यात आली होती, काही दिवस यात असलेल्या रोपांची देखभाल करण्यात आली पण ऐनवेळी उन्हाळ्यात पाणी कमी पडून वृक्ष कोमेजून गेली. मग आता जून महिन्यात लागवडी करिता वृक्षांची रोपे आणणार कुठून आणि वृक्षारोपणाचा लागवडीचा कार्यक्रम होणार की नाही…? की फक्त फोटो काढण्यापुरते किरायावर रोपे आयात केली जाणार हे मात्र या जून महिन्यात किंवा जुलै च्या काही दिवसांत पहावयास मिळेल.
येथे रोपांना पाणी देण्यासाठी विहीर आहे पण उन्हाळयात पाणी आटल्याने पर्यायी व्यवस्था न करता त्या रोपट्याना वाऱ्यावर सोडल्याचे पातक सामाजिक वनीकरण विभागाकडून झाले, बाजूला असणाऱ्या शेतकऱ्याकडून ऊपलब्ध होणारे पाणी घेऊन रोपांची जोपासना करता आली असती पण कर्मचाऱ्याचे मस्टर निघत नसल्याने आमचा नाईलाज असल्याचे मत येथील कर्मचाऱ्याचे आहे. मग या पाण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या खात्यात निधी नव्हता की काय…? अशी शंका वृक्षप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मागिल काळात झालेल्या लाखो रूपयाचा घोटाळा या विभागात घडला पण रोपांच्या संगोपनासाठी निधी उपलब्ध नसणे हे या विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
रोपे नाहीत, वृक्ष लागवड नाही, असलेल्या रोपाचे संगोपन नाही मग तालुक्यांत सामाजिक वनीकरण विभागाचे काय कार्य आहे…? , या उलट या विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ईतर विभागास जोडून दुसरे काही तरी काम लावण्याचा आदेश शासनाने पारित करावा अशी कुजबूज तालुक्यांत सूरू आहे. तालुक्यांत सामाजिक वनीकरण विभागाचे छोटे, मोठे काम असल्यास हंगामी रोजगार लावावे, जेणेकरुन दरमहा लाखोंचा शासनाचा कर्मचाऱ्याच्या पगारावर होणारा खर्च तरी वाचेल …? अशी संतापजनक प्रतिक्रिया वृक्ष प्रेमी कडून व्यक्त केले जाऊ लागली आहे.
##सत्यप्रभा न्यूज नांदेड##