नांदेड: उत्तर भारतात सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा फटका नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात दळणवळण बंद असल्याने केळीची निर्यात प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २२०० रुपया पर्यंत गेलेले केळीचे दर आता १४०० रुपयांवर घसरले आहे. अवघ्या पाच दिवसात केळीच्या दरात ८०० रुपये घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड या तीन तालुक्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केळी जाते. जवळपास १२ हजार हेक्टरवर केळीची लागवड केळी जाते. अर्धापूर तालुक्यातील केळी ही प्रसिद्ध आहे. देशातील अनेक राज्यासह इराण, इराक, दुबई या देशात केळीची निर्यात केली जाते. १५ ते २० दिवसांपूर्वी चंदीगड, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी केळीच्या २५ मोठ्या गाड्या गेल्या होत्या. एका गाडीमध्ये साधारण १५ ते २० टन केळी असतात. याठिकाणी २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळला होता. त्यामुळे केळी उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्याचवेळी पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे, असे केळी उत्पादक शेतक-याने सांगितले आहे. मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी केळी काढणीला आली असताना आंब्याचा हंगाम सुरू झाला आणि आवक वाढली होती. त्यामुळे केळीच्या दरावर परिणाम झाला.दर अडीच हजार रुपये क्विंटलावरून ६०० रूपयांवर आले होते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. त्यानंतर पुन्हा जूनच्या शेवटी पाऊस पडताच केळीच्या दराने उच्चांक गाठला. चंदीगड, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणी पाठवल्या जाणाऱ्या केळीला २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर स्थानिक बाजारात जाणारी केळी १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. आता पुन्हा निर्यात बंद झाल्याने दीड हजार रुपयांच्या खाली आला आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!