बारामती दि.,३१ जानेवारी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत असतानाच आता एक भावूक करणारी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे विमान बारामतीत लँड झाल्यानंतर ते सर्वप्रथम आपल्या आईची, आशाताई पवार यांची भेट घेण्यासाठी काटेवाडीला जाणार होते, परंतु नियतीने काही वेगळेच मांडून ठेवले होते.
सकाळी ७ वाजता आला होता फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दिवशी सकाळी ७ वाजता अजितदादांचा त्यांना फोन आला होता. त्यांनी गुजर यांना विमानतळावर काही कागदपत्रे घेण्यासाठी बोलावले होते. दादांनी सांगितले होते की, “सकाळी ८.४५ वाजता विमान लँड होईल. त्यानंतर मी थेट काटेवाडीला घरी जाऊन आईला भेटणार आहे आणि मगच जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढील दौऱ्यावर निघणार आहे.” मात्र, ही भेट कधीच होऊ शकली नाही.
आई टीव्ही पाहत असतानाच बातमी आली
एकीकडे अजित पवार आईला भेटण्यासाठी आतुर होते, तर दुसरीकडे त्यांचे विमान क्रॅश झाल्याची बातमी टीव्हीवर झळकू लागली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा विमान अपघाताची बातमी वृत्तवाहिन्यांवर सुरू झाली, तेव्हा अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार टीव्ही पाहत होत्या. त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारले की, “दादांच्या विमानाला काही अपघात झाला आहे का?” परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि त्यांना मोठा धक्का बसू नये म्हणून फार्महाऊसवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ टीव्ही केबल डिस्कनेक्ट केली आणि त्यांचा फोनही ‘फ्लाईट मोड’वर टाकला.
नेमका अपघात कसा झाला?
मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या खाजगी विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग करताना अपघात झाला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानता (Poor Visibility) यामुळे पायलटला रनवे दिसण्यास अडचण आली. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना हे विमान धावपट्टीच्या जवळच कोसळले आणि त्यात अजित पवारांसह पायलट, को-पायलट आणि इतर कर्मचारी अशा ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.













