मुंबई दि.३ फेब्रुवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपला आता घराणेशाहीच्या आरोपांतून कायमची मुक्ती आणि ‘मोक्ष’ मिळाला आहे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. राऊत यांनी म्हटले की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा ते ठाकरे आणि गांधी कुटुंबातील घराणेशाहीवर सडकून टीका करतात. मात्र, आता सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करून भाजपने स्वतःलाच या विरोधाभासातून मुक्त करून घेतले आहे. यामुळे, यापुढे घराणेशाहीवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला उरलेला नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठी अस्मितेचा आणि जमिनीशी जोडलेल्या रांगड्या माणसांचा पक्ष आहे. हा पक्ष पाटील आणि भोसले यांच्या वारशाचा असून तो ‘पटेलां’च्या (प्रफुल्ल पटेल) हाती जाऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. सत्तेची सर्व सूत्रे ही मराठी चेहऱ्याकडेच राहिली पाहिजेत, याची काळजी सुनेत्रा पवार यांनी घेणे आवश्यक असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, अजितदादांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही आणि भाजपच्या ताटाखालचे मांजर होणे त्यांनी अनेकदा टाळले होते.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या मनात असते तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती वेगळी होती. शरद पवार हे नेहमीच संयमाने राजकारण करतात, ते कधीच राजकारण ताणून धरत नाहीत. भाजपच्या काळात ज्यांच्यात क्षमता नव्हती, अशा अनेकांनी केवळ ‘होयबा’गिरी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण अजित पवार कधीही कोणाचे ‘होयबा’ झाले नाहीत.
तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र यावेत अशी खुद्द अजित पवारांची इच्छा होती, असा दावाही राऊत यांनी केला. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या आणि अजितदादांच्या मनात शरद पवारांबद्दल शेवटपर्यंत आदर आणि ओलावा होता. मात्र, धाक, दहशत आणि दबावाचे राजकारण करून त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेले. अजित पवारांना वाटत होते की जे झाले ते योग्य नाही, पण काहींना आपल्या ‘दुकानदाऱ्या’ बंद होण्याची भीती वाटत होती, त्यामुळेच हे विलीनीकरण होऊ दिले गेले नाही, असे गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केले.













