बारामती: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी (Baramti Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या (Sunetra pawar) प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, भगिनी सई पवार देखील उपस्थित होते. Rohit Pawar Baramti Election
यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी म्हटलं की, आजपर्यंत प्रचार असेल तर तो साहेबांचा असायचा, दादांचा असायचा. मी लहान असताना मी अजित दादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती. दादांनी मला जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं. त्यावेळी दादा निर्णय घेत होते. मी इथून उभा राहिलो होतो. आज पवार साहेबांमुळे हा परिवार आहे, पण नंतरच्या काळात अनेक नेते आहेत, महाराष्ट्रात जे अजित दादांमुळे आहेत, आल्या आल्या अजित दादांच्या फोटोला हात जोडावे लागतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं. आता आपला नेता पुन्हा दिसणार नाही. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांचा मी फॅन होतो, ते माझे काका होते, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठ्या पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभा राहायला नको होतं, आपल्या गावातून एक सुद्धा मत अपक्ष उमेदवारांना होणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व ९९ टक्के मतदान सुनेत्रा पवारांना होईल यासाठी प्रयत्न करा. दादांकडे बघून मी प्रचारासाठी आलो आहे. जे बाहेरून आलेत त्यांना एक सुद्धा मत मिळाले नाही पाहिजे. बाकी काही गोष्टी आमच्या मनात आहेत. काही घटना घडल्या त्याची उत्तर अनुत्तरित आहेत. साडेनऊची वेळ होती, आज आपण लवकर आलो कदाचित ती दादांची स्टाईल असावी, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मला काही अधिकारी सांगतात, आम्हाला आजही वाटत की, आज दादांचा फोन येईल आणि सांगतील आपल्याला तिथे भेट द्यायची आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराला येताना ती घटना घडली. तुमच्या आमच्या मनात दादांचं नाव हे कायम स्वरुपी राहणार आहे, बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचं हे माहित असतं, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
अजित होत आहे दादांचे काम बारामतीकरांना माहिती आहे. दादा गेल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, सुनेत्रा पवार उभे आहेत. अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान प्रत्येक गावातून सुनेत्रा पवार यांना व्हावं ही विनंती मी करत आहे. बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही तुम्ही त्यांना विनंती करू शकता. इथे असणाऱ्या लोकांचं आभार परिवारावर प्रेम आहे. मी लोकांशी संवाद साधलेला आहे. हा प्रचार दौरा नसून मी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. मी रोहित पवार म्हणून नाही तर अजित दादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारात आलेलो आहे. पूर्वीच्या निवडणुका पाहिल्या तर महाराष्ट्राने बघितल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीला परिवार आम्ही सर्वजण एकत्रित फिरत होतो. तो जो काळ होता तो परिवारासाठी संयुक्तिक आणि चांगलं काळ होता. ज्या नंतर गोष्टी झाल्या त्या झाल्या. दादा गेल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे यावं लागत आहे हे दुर्दैव आहे. या ठिकाणातून सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणावरून प्रयत्न करत आहे.
सुनेत्रा काकी निवडून आल्यात आपल्या सर्वांच्या मनात माहीत आहे. दादांकडे बघून कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी फिरत असतो. शरद पवार हे फार मोठे देशाचे नेते आहेत. त्यांनी दोन गोष्टी महत्वाच्या दिलेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे दादांचा पक्ष आणि पवार साहेबांचा पक्ष हे जे दोन प्रमुख पक्ष आहेत या पक्षांना इथली लोकांची ताकद आहे. लोकसभा पण पाहिली आणि विधानसभा जर पाहिली तर प्लस मायनस झाले आहेत. सर्वात पहिला निर्णय शरद पवार यांच्या पक्षांनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतला. शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेस उमेदवारी मागे घेतील की नाही शक्यता होती. त्यांची मागणी होती अजित दादांच्या अपघाता संदर्भात एफआयआर झाला पाहिजे. कारवाई जलदगतीने झाली पाहिजे. शेवटी पवार साहेब, सुप्रियाताई आणि आमच्यासारख्या काही लोकांनी थोडे तर प्रयत्न केल्यामुळे काँग्रेसने सुद्धा माघार घेतली. आज प्रमुख पक्ष रिंगणात नाहीत आणि त्यामध्ये मोठा वाटा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी या ठिकाणी सभा घेतली पाहिजे अशी कोणाची अपेक्षा नाही. परिवार म्हणून जे करायचं होतं ती त्यांची जबाबदारी शरद पवार साहेबांनी लोकशाही पद्धतीने पार पाडली अशी सामान्य लोकांची भावना आहे.
अजित दादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे,व्यक्तिगत मदत केली आहे. या निवडणुकीत आमच्यासारखे लोक किंवा इतर लोकप्रचारात सहभाग घेत आहेत, ते अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे दिलेल्या प्रेमामुळे दिलेल्या ताकतीमुळे. अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरा कुठलाही विषय नाही.