Operation Sindoor | नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलानं जम्मू काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक केला आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ऑपरेशन सिंदूर सुरु केलं. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की आमची कारवाई केंद्रीत,स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे. आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतानं ठिकाणांची निवड करण्यात आणि ते उद्धवस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय 25 आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाच्या वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईळ. ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं.
जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात 22 एप्रिलला पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या द रेजिस्टंस फ्रंटचा हात होता, त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या दबावामुळं त्यांनी जबाबदारी झटकली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची अमानूष हत्या करण्यात आली होती. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय स्थानिक राज्य सरकारनं घेतला आहे.
भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार स्थगित केला आहे. पाकिस्तानचे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केलेत. याशिवाय भारतानं पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी संख्या देखील कमी केलीय.