उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.
अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त लातूरमध्ये पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतक-यांना आधी तातडीची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसेच धाराशिव जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतक-यांना कायमस्वरुपी दिलास मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरमधील पूरग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.