१ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत सर्व गावात अभियान
नांदेड, ३० : जिल्ह्यातील गावे स्वच्छ, सुंदर होण्यासाठी ‘कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियान म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. या अभियानात गाव स्तरावर शासकीय निमशासकीय कर्मचारी, महाविद्यालय विद्यार्थी, विविध सेवाभावी संस्था, बचत गट व मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हयाचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांनी केले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान आजपासून राज्यात सुरु होत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश गाव पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण करून नाडेप खड्डयाच्या माध्यमातून सेंद्रीयखत निर्मिती तसेच घनकचऱ्याचे पुनर्वापर व व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक विकास साधणे हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची सेंद्रीय क्रांती घडवून आणण्यासाठी 'कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू' हे अभियान १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व गावात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावात सेंद्रीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी हे अभियान अतिशय महत्त्वपूर्ण असून याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. या संपूर्ण मोहीमेची पडताळणी जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वयक, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. नाडेप खड्यामध्ये भरलेला कचरा आणि खत निर्मितीची प्रक्रीया तपासली जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी सेंद्रीयखत निर्मिती सुलभ होणार असून पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीस चालना मिळेल, कचऱ्याचा पुनर्वापर खत निर्मिती आणि शाश्वत स्वच्छतेच्या दृष्टीने ही मोहीम महत्वपूर्ण ठरणार आहे. गावातच सेंद्रीयखत तयार व्हावे कचऱ्यावर उपाययोजना आणि जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हीच या अभियानाची मुख्य संकल्पना असून या अभियानात जिल्हयातील सर्व गावांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हयाचे पालकमंत्री ना. अतुल सावे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेच्या सोयी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपोस्ट खड्डा भरून आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान १ मे पासून सुरू होत आहे. तरी या अभियानात सर्व लोकप्रतिनिधींसह समस्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व आपले गाव स्वच्छ ठेवावे. ना. गुलाबराव पाटील, मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड