ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.२१जून : मागे झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. पण अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे शेतकरी नेते प्रकाश भाऊ पोहरे प्रणित शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटनेने तीव्र लढा चालू केला असून कर्जमुक्तीच्या संदर्भात ते आता थेट सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांनी व्यापक सर्वे चालू केला असून कोणत्या तालुक्यात किती शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असल्याची माहिती ते घेत आहेत.
धर्माबाद तालुक्यातून पहिल्या टप्प्यात तब्बल १०० शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे अर्ज भरून दिले होते. दुसऱ्या टप्प्यात काल १९ जून या शेवटच्या तारखेपर्यंत तब्बल २०० शेतकऱ्यांनी आपले कर्ज मुक्तीचे अर्ज भरून दिले. सदरील अर्ज शेतकऱ्यांना न चुकता रीतसर भरून देण्यासाठी प्रशांत मल्टी सर्विसेसचे राहुल भुतनरे यांनी मोलाचे योगदान शेतकऱ्यांसाठी दिले. आज तहसील कार्यालय येथे प्राथमिक स्वरूपात मंडल महसूल अधिकारी साईनाथ वारेवार यांनी सदरील किसान कर्ज मुक्तीचे अर्ज स्वीकारले. यावेळी दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी संजय कदम व प्रशांत मल्टी सर्विसेसचे राहुल भुतनरे हे उपस्थित होते.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!