मुंबई दि.१५ फेब्रुवारी: काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी म्हैसूरचे शासक टिपू सुलतान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या तोडीचे मानले पाहिजे असे विधान केले होते, ज्यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र आक्षेप घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, भाजपने माझ्या पुतळ्याचे दहन करण्यापेक्षा सावरकरांच्या त्या विधानाकडे लक्ष द्यावे. सावरकरांनी “शिवाजी महाराज यायला… कावळा बसायला आणि डांग तुटायला” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते, असा दावा सपकाळ यांनी केला. सावरकरांनी महाराजांबद्दल असे विधान केले असताना, त्या अनुषंगाने भाजप सावरकरांचे पुतळे जाळणार आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, निवडणुका आल्या की भाजपला टिपू सुलतान चालतात. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपल्या घोषणापत्रात टिपू सुलतान यांचे छायाचित्र वापरले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी विधाने केली होती, ती विकृत स्वरूपाची होती. मग भाजप कोश्यारींचे पुतळे का जाळत नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
सपकाळ यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना स्पष्ट केले की, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि शौर्याचा विचार मांडला, त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनीही त्यांच्या काळात शौर्याने काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे मत त्यांनी पुन्हा एकदा मांडले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता, ज्याला आता सपकाळ यांनी सावरकर आणि कोश्यारी यांच्या विधानांची ढाल करत प्रत्युत्तर दिले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













