नांदेड दि.६ फेब्रुवारी: विज्ञान व तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातल्यासच ऊर्जा स्त्रोत जिवंत ठेवून त्यांची पुनर्निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन प्रोफेसर री-ची मुराकामी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र संकुलांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या अर्थसहाय्याने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी ते बोलत होते.
प्रो. मुराकामी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात ऊर्जा स्त्रोतांचे संवर्धन, त्यांची पुनर्निर्मिती तसेच वाहतूक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचा प्रभावी वापर कसा करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जैविक प्लास्टिकची निर्मिती, त्यांचे गुणधर्म व विविध उपयोग यावर त्यांनी विशेष भर दिला. मात्र या क्षेत्रात सर्व संबंधित शाखांचा समन्वय साधून तंत्रज्ञान विकसित करणे हे भविष्यातील मोठे आव्हान ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रो. मुराकामी यांचा शाल, पुस्तक व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मटेरियल सायन्स, सेमी-कंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स व संसाधनांवरील संशोधन, निर्मिती आणि शाश्वत उपयोगिता या विषयांवरील परिषदेचे उद्दिष्ट विशद केले. याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे संचालक डॉ. डी. आर. मुंडे, तसेच डॉ. टी. ए. कदम उपस्थित होते.
परिषदेतील दुसरे व्याख्यान प्रो. मोहम्मद एस. बडवाय (एलामेन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, इजिप्त) यांनी “टेक्नॉलॉजी अँड चॅलेंजेस ऑफ रेडीओअॅक्टीव्ह मटेरियल अँड एनर्जी सोर्सेस एप्लिकेशन” या विषयावर दिले. त्यांनी रेडिएशन ऊर्जेचे प्रकार, विविध क्षेत्रांतील उपयोगिता तसेच या संशोधन क्षेत्रातील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला.
दुपारच्या सत्रात डॉ. योगेश दशरथे (नोव्हा पॉलीकॅम्प प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर) यांनी प्लास्टिकचे उपयोग, रिसायकलिंग, रियूज तसेच बायोप्लास्टिक निर्मितीचा अक्षय ऊर्जा निर्मितीत होणारा उपयोग यावर आपले विचार मांडले. तसेच इजिप्त येथील मॅडम इस्रा खमिस यांनी सप्लाय चेन या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी केले, तर रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका व परिषदेच्या संयोजिका डॉ. संगीता माकोने यांनी हरित ऊर्जा निर्मितीसाठी रसायनशास्त्राचे महत्त्व विशद करून आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. अविनाश सरोदे यांनी केले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













