Raj Thackeray on Marathi Community in Mumbai: मराठी आणि अमराठी असा वाद पुन्हा डोकं वर काढत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुंबई आणि मराठीशी असणारं मुंबईचं नातं यावर आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर ठाकरेंनी दिलं.
मुंबई शहरातील (Mumbai News)मराठी भाषिकांची संख्या आणि त्याबाबतची आकडेवारी सादर मुंबईतून मराठी नामशेष व्हायला किती वर्ष लागतील? असा प्रश्न मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मुंबईतून मराठी नामशेष नाही, अशा कणखर शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.
‘मुंबईतून मराठी नामशेष नाही होणार. मुळात आपल्याकडे येणारे आकडे आहेत ते वेगळे आहेत. साधारण 35 ते 40 टक्के मराठी माणूस मुंबई शहरात राहतो. टक्का कमी झाला यात काही वाद नाही. मात्र बाकिच्यांचाच टक्का वाढला आहे. मुंबईवरची मराठी छाप पुसली जाऊ शकत नाही आणि कोणी ती पुसायची हिंमतही करु नये’, असा थेट इशारा त्यांनी दिला.
मराठी माणूस बेसावध आहे असं म्हणताना मराठी माणसानं आजुबाजूला काय चाललंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे या शब्दांत सामान्य मराठी माणसाला सतर्क केलं. मराठी माणसाच्या स्थलांतरासंदर्भातील प्रश्न विचारला जाताच ही गोष्ट प्रत्येक राज्यात होते ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. कुटुंब वाढतात, घरं लहान पडतात आणि अनेकजण स्थलांतरीत होतात असं म्हणताना त्यांनी शहरातील गगनचुंबी इमारती, अनेक ठिकाणी असणारे टॉवर आहेत तिथं व्यवस्थित पाहिलं असता तिथं तुम्हाला मराठी माणसं दिसतील. मराठी माणसाला घर परवडत नाही असं नाही हा भ्रम आहे. मुळात कोणत्याही राज्यातून तिथला माणूस संपत नसतो, हेच राज ठाकरे यांनी या मुलाखतीदरम्यान स्पष्टपणे मांडलं.