नांदेड | नांदेड मनपा अंतर्गत असलेल्या (Nanded News) शोभानगर रोडवरील वसंतराव नाईक उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्यानातील लॉन व फुल झाडे आपलं अस्तित्व गमावण्याकडे वाटचाल सुरू झाली असून सर्वत्र फरशीच्या तुकड्यांचे ढिगारे व कचराच कचरा पसरलेला दिसून येतो. तर उद्यानाच्या गेट पुढे खोदून ठेवल्यामुळे जेष्ठ नागरिकांचा दगडावरून पाय घसरून पडण्याची व फ्रॅक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही .गेट पुढे का ? कशासाठी ? व कोणी खोदले ? हे प्रशासनालाच माहिती असेल.
आनंद नगर ते शोभा नगर रोडवर नाईक नगर मध्ये “वसंतराव नाईक उद्यान ” आहे. ५ ,६महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून लॉन व फुल झाडांची लागवड केलेली होती . तर महिन्यापूर्वीच वाकिंग ट्रॅक वरील फरशी काढून पेवर बसवण्यावर लाखोंनी खर्च केलेला आहे. हा सगळा पैसा जनतेकडून कर स्वरूपात गोळा करून खर्च केला जात असतो. तो पैसा वाया घालवणे संयुक्तीक ठरणार नाही .हा लाखोंचा खर्च वाचवण्यासाठी पाण्याच्या व्यवस्थेवर हजारो खर्च करणे शहाणपणाचे ठरणार ,असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्ये संदर्भात काही मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आहे:
“उद्यानातील बोअर कोरडा झाल्यामुळे व पाण्याअभावी उद्यानाची दुरावस्था झाली आहे. सोसायटीने उद्यान मनपाकडे सोपवल्यामुळे मनपा प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून उद्यानाला वाचवावे.”
नाईक नगर सोसायटीचे अध्यक्ष जाधव सर.
“मनपाचे क्षेत्रीय कार्यालयातील बेग साहेबांना उद्यानातील पाण्याच्या व फरशीच्या प्रश्नाविषयी सांगितले असता, ते उद्यानात आले, नवीन नळ कनेक्शन देऊ म्हणाले . परंतु अजून पर्यंत कामाला मुहूर्त मिळाला नाही. “
मारकवार सर, प्रभाग क्रमांक चार च्या नागरिक कृती समितीचे अध्यक्ष
“पेवर्स बसवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला फरशीचे तुकडे काढायला सांगतो. “
मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम सर
” बेग साहेब व उद्यान सुपरवायझर महाबळे उद्यानात येऊन गेले. नळाचे कनेक्शन देतो म्हणाले. परंतु आज पर्यंत नळाचे कनेक्शन न मिळाल्यामुळे लॉन व झाड रखरखत्या उन्हात वाळत आहेत.”
उद्यानातील वाचमन उत्तम राम भारती
ज्या गुत्तेदारांनी वाकिंग ट्रॅक वरील फरशा काढल्या आणि पेवर बसविले त्या गुत्तेदारांनी अखंड फरशा व तुकडे झाडांमध्ये फेकून देणे बाबत मनपाने दिलेल्या वर्क ऑर्डर मध्ये कदाचित नमूद केलेले असावे ,असे अनेकांना वाटत आहे .हे सुद्धा काय खरे ? ती मनपा प्रशासनालाच माहिती असणार.
हे वसंतराव नाईक उद्यान आहे की वेळी -अवेळी,रात्री – अपरात्री क्रिकेट खेळायचे मैदान आहे ? असा प्रश्न उद्यानाच्या सभोवताल राहणाऱ्या रहिवाशांपुढे निर्माण झाला आहे. कारण वसंतराव नाईक उद्यानाला वेळ निश्चित केलेला नाही आणि निदर्शनास येईल असा गेटच्या बाजूला लिहिला सुद्धा नाही. उद्यानाच्या गेटला लॉक लावायची व्यवस्था नाही. त्यामुळे मुलं कधीही क्रिकेट खेळतात व मद्यपी पार्ट्या करतात. रात्री बे रात्री मुलं फटाके फोडून लोकांच्या झोपेचा खेळ खंडोबा करतात . एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला क्रिकेटचा बॉल लागला तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते. असे होऊ नये ,परंतु असे झाल्यास मनपा प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रशासनाने प्रतीक्षा करू नये. असे नागरिकांचे म्हणणे आहे .
या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गेटमधून प्रवेश केलाच तर पळून जाण्यासाठी गेटच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील कंपाउंड वॉल वरील लोखंडी ग्रील मध्यपिन्नी काढून नेल्या आहेत .आता मद्यपी सुद्धा मनपाचे नागरिकच असल्यामुळे कदाचित त्यांच्यासाठी लॉक लावण्याचे मनपा दुर्लक्ष करीत आहे की काय ? अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे. सोमवार दिनांक २१ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वाजता तर विमानतळ पोलिसांनी स्वतः येऊन क्रिकेट प्रेमींच्या त्रासापासून आजूबाजूच्या रहिवाशांची मुक्तता केली. त्यामुळे सर्वांनी पोलिसांचे आभार मानून शांत झोपी गेले होते. संबंधितांना हाकलून लावण्यापेक्षा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यास आळा बसेल, असे अनेकांचे मत आहे.
तरी मनपा प्रशासनाने वसंतराव नाईक उद्यानात त्वरित नळाचे कनेक्शन देऊन पाण्याची व्यवस्था करावी ,उद्यानाचा वेळ निश्चित करून उर्वरित वेळेत उद्यानाच्या गेटला लॉक लावण्याची व्यवस्था करावी व तशी सूचना लिहावी ,अशी अपेक्षा प्रभाग नंबर ०४ च्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे व्यक्त केली आहे .मनपा प्रशासनाच्या कृतिकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. मनपाचे क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ०२ अशोक नगरच्या नव नियुक्त “पालक अधिकारी” उपायुक्त सुप्रिया टवलारे यांची याकडे लक्ष देण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे.