नांदेड दि.१२: मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पात येवा सुरू झाला असून जिल्ह्यातील १०४ मध्यम व लघु प्रकल्पांत १६२.३७ दलघमी उपयुक्त साठा असून त्यात १५.८९ दलघमीने वाढ झाली आहे.
नांदेडकरांची तहान भागविणाऱ्या ‘विष्णुपुरी’च्या जलसाठ्यात सध्या ३४.६३ दलघमी साठा असून त्यात ७.६३ दलघमीने वाढ झाली आहे.
तापमानातही कमालीची घट झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण घटले तरी मागील वर्षीच्या तुलनेत (२०८.४९ दलघमी) आजच्या तारखेतील प्रकल्पातील साठा ४६.१२ दलघमीने कमीच आहे. हे नांदेड पाटबंधारे विभागाच्या ११ जुलैच्या साप्ताहिक पाणीपातळी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात मागील आठवडाभरात जिल्ह्यात मध्यम व लघु १०४ धरण क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाला. तसेच, कमाल व किमान तापमातही घट झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मध्यम व लघु १०४ प्रकल्प आहेत. यात १६२.३७ दलघमी उपयुक्त साठा असून त्याची टक्केवारी २२.३० इतकी आहे. यात गोदावरी नदीवरील काळेश्वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात गेल्या आठवड्यात २७.०० दलघमी पाणीसाठा होता. त्यात ७.६३ दलघमी वाढ होऊन सध्या ३४.६३ दलघमी उपयुक्त साठा आहे.
त्याची ४२.८६ इतकी टक्केवारी आहे. मानार प्रकल्पात मागील आठवडयात ३०.७१ दलघमी इतका साठा होता. यात १.१३ दलघमीने वाढ होऊन ३१.८४ दलघमी साठा झाला असून त्याची टक्केवारी २३.०४ इतकी आहे. तसेच मध्यम ९ प्रकल्पात मागील आठवड्यात १८.८० दलघमी साठा होता, यात ४.५९ दलघमीने वाढ होऊन २३.३९ दलघमी उपयुक्त साठा झाला आहे. त्याची टक्केवारी १६.८२ इतकी आहे.
उच्च पातळी ९ बंधाऱ्यात मागील आठवड्यात ४४.६६ दलघमी उपयुक्त साठा होता. यात ०.४४ ने वाढ होऊन ४५.१० दलघमी पाणी साठा झाला आहे. त्याची टक्केवारी २३.७६ इतकी झाली आहे. तर, ८० लघु प्रकल्पांत मागील आठवड्यात २५.३१ दलघमी पाणी साठा होता. यात २.१ दलघमीने वाढ होऊन २७.४१ दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी १५.८६ इतकी आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरवातीला झालेल्या एक ते दोन पावसाने प्रकल्प तुडुंब भरला होता.
हिंगोलीतील ३१ प्रकल्पांत १६.४ दलघमीने घट
शेजारील हिंगोली जिल्ह्यातील ३१ प्रकल्पांत २४४.७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २५.७७ झाली आहे. गेल्या आठवड्यात उपयुक्त पाणीसाठा २२८.३३ दलघमी होता. त्यात १६.४ दलघमीने घट झाली आहे. तर, परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत २१.२८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २१.६६ इतकी आहे. गेल्या आठवड्यात उपयुक्त पाणीसाठा १५.९३ दलघमी होता. त्यात ५.३५ दलघमीने वाढ झाली आहे.
मुखेडमध्ये १५ टँकर, ३६ विहिरींचे अधिग्रहण
मागील आठवड्यात मुखेड, कंधार, देगलूर व किनवट या चार तालुक्यांत प्रशासनाने विहिरींच्या अधिग्रहणाला मुदतवाढ दिली होती. परंतु, आता परिस्थिती बदलली असून मुखेडमध्येच वरच्या भागातील गावे आणि वाड्यांमध्ये ३६ विहिरींचे अधिग्रहण व १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रकल्पांतील उपयुक्त साठा (दलघमी) व टक्केवारी
- विष्णुपुरी प्रकल्प – ३४.६३ : ४२.८६%
- येलदरी – २३९.८६ : २९.६२%
- सिद्धेश्वर -०० : ००%
- इसापूर -३२१.३१ : ३३.३३%
- प्रकल्पांत – १०४
- दलघमीने वाढ -५.८९
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
