जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. गेल्या ९ दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नसल्याने त्यांना खूपच अशक्तपणा आला आहे. डॉक्टरांकडून त्यांना सलाईन दिलं गेलंय. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा वाढतो आहे. दरम्यान, जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीही त्यांना धीर दिला आहे. प्रकृती खालावली असल्याने सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घेऊन त्यांचं उपोषण सोडवावं. आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पप्पा, मागे हटू नका, आरक्षण घेतल्याशिवाय घरी येऊ नका, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिलाय. तसेच जरांगे पाटलांचे वडील आणि पत्नी यांनीही समाजासाठी काहीतरी करून दाखवायची हीच वेळ असल्याचं सांगत कुटुंबीय म्हणून तुमच्यासोबत आहोत, आरक्षण घेऊनच घरी या, असा संदेश दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून जरांगे पाटील यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असताना कुटुंबीय म्हणूनही वडील, पत्नी आणि मुलांची त्यांना मोलाची साथ मिळतीये. घरची काळजी करू नका, समाजाची काळजी घ्या, तुमच्या आरक्षणाने समाज बांधवांचं कित्येक पिढ्यांचा वनवास संपणार आहे, असं सांगत आम्ही ठामपणे तुमच्या मागे उभे असल्याचा संदेशच कुटुंबीय जरांगे पाटलांना प्रसारमाध्यमांद्वारे देता येत. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या, “मी माझ्या डोळ्यातले अश्रू दाखवून उपोषण मागे घ्या, असं म्हणणार नाही. त्यांची कितीही काळजी वाटत असली तरी त्यांना त्यांच्या निर्धारापासून मागे खेचणार नाही. गेल्या ९ दिवसांपासून माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं नाही. टीव्हीवरूनच त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या कळतायेत. प्रकृती खालावत असल्याची बातमी मी टीव्हीवरून पाहिली. मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका. मायबाप सरकारला विनंती करते, त्यांचा अंत पाहू नका, लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्या”
पप्पा हट्टी आहेत, शब्दाचे पक्के आहेत. ते आता माघार घेणार नाहीत. त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी मी टीव्हीवरून पाहिली. जर त्यांच्या तब्येतीला काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य शासन असेल, असा इशारा देतानाच आरक्षण घेतल्याशिवाय उठू नका, आरक्षण घेऊनच घरी परत या, असा संदेशच जरांगे पाटलांच्या लेकीने त्यांना दिला. समाजासाठी जमीन विकताना मला मनोजने काही सांगितलं नाही. मी देखील त्याला काही बोललो नाही. विचारलं तर मी समाजासाठी काम करतोय, असं त्याने मला सांगितलं. त्यानंतर मग आम्ही त्याला डिवचलं नाही. गेली कित्येक वर्षे तो समाजासाठी रात्रंदिवस काम करतोय. आताही समाजासाठीच उपोषणाला बसला आहे. आम्ही कुटुंबीय म्हणून त्याच्यामागे उभे आहोत, त्याने माघार घेऊ नये पण हे करत असताना त्याने तब्येतीची काळजी घ्यावी, असं आर्जव मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांनी त्यांना केले.
“वडिलांची ढासळलेली तब्येत बघून जीव तुटतो. डोळ्यात पाणी येतं, पण त्याचवेळी समाजचं दृष्टीक्षेपात असलेलं आरक्षणही दिसतं. म्हणून मला पप्पांना सांगायचंय, आता मागे हटू नका, आरक्षण मिळवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही, सरकारला सांगणं आहे, लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांचं उपोषण सोडवा”, अशी विनंती जरांगे पाटलांच्या मुलाने केली. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!