“अनुसूचित जाती उपवर्गीकरण” ही मागणी म्हणजे माझ्या मते “एक- दोन शीतं मिळवण्यासाठी संपूर्ण भाताचं पातेलं करपवून टाकणे ” किंवा “एक आंबा हाताला येत नाही म्हणून भाड्याने JCB बोलवून आंब्याचे झाडच खाली पाडुन JCB मालकाच्या हाताने उपकार म्हणून एक दोन आंबे मिळवणे”. यापलीकडे काही नाही.
माझ्या मातंग बांधवांनो फक्त आरक्षणाने सर्व समस्या सुटत नसतात जर सुटायच्या असत्या तर आजपर्यंत आरक्षित समूहांच्या सर्व समस्या सुटल्या असत्या.ते एक साधन जरुर आहे पण साध्य नाही. त्यामुळे वर्गीकरण झाले म्हणजे आपल्याला जणू स्वातंत्र्य मिळणार आहे असं भासवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. परंतु सत्य हे आहे कि यातुन फायदा तर होणारच नाही परंतु बहुजन महापुरुषांच्या व आंबेडकरी सामाजिक चळवळीच्या कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर निर्माण झालेल्या संघटन शक्तीला तडा जाणार आहे.
त्याचे कारण असे कि, सरकारी क्षेत्रच आता खाजगी होऊन बसलय जिथे आरक्षण लागू नाही. आणि आपण मोजक्या सरकारी नोकरीसाठी एका ताटात खालेल्या आपल्याच बांधवाशी वैर निर्माण करण्यास सत्तधार्यांना व मनुवाद्यांना वाव देत आहोत ज्यांना आमचं साधं माणुसपण मान्य नाही. आपल्यात काही अंतर्गत रुसवे फुगवे आपण आपल्या पातळीवर सोडवू शकतो. अनुसूचित जातीत जे समूह शैक्षणिक व सामाजिक पातळीवर मागे राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी कृती आराखडा तयार करून आपण याही समस्यांचे निराकरण सामाजिक चळवळीच्या माध्यमातून करू शकतो. बाबासाहेबांना मानणारा कुठल्याही जातीचा व्यक्ती काळाच्या मागे पडलेल्या कोणालाही पुढे आणण्यासाठी क्षणाचाही विचार न करता जी शक्य असेल ती मदत करायला तयार असतो. जात बघून आंबेडकरी चळवळ मदतीला धावत नाही तर शोषित, पिडीत, वंचित समूह कोणाकडूनही छळल्या जात असेल तर छातीचा कोट करून लढायला समोर येते. खैरलांजी प्रकरणापासुन सद्याच्या लातूरच्या अनुष्का पाटोळे प्रकरणापर्यंत आंबेडकरी चळवळ मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपल्यासोबत उभी आहे. अशा जीवाभावाचे सबंध असलेल्या आपल्या बांधवांशी आपले सबंध बिघडावे यासाठी मनुवादी हा खेळ खेळत आहेत एवढे आपल्याला समजायला नको का? आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले तरी बौद्ध समाजाला त्याचा काही फटका बसणार नाही कारण आरक्षणाव्यतिरीक्त बरेच प्रगतीचे मार्ग त्यांनी निर्माण केले आहेत परंतु मातंग, चर्मकार व इतर छोट्या जातीसमुहांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे पोटतिडकीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरक्षणाच्या भरवशावर सर्वांनाच सरकारी नोकरी शक्य नाही. त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या संधी खाजगीकरण, जागतिकीकरण व उदारीकरणाने निर्माण केल्या त्या आम्ही मिळवल्या पाहिजे.
1) भारतीय व बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांना सुद्धा कुशल व मेहनती कर्मचार्यांची गरज आहे. आपल्या शिक्षण व अनुभवानुसार तिथेही चांगला पगार,सामाजिक सुरक्षा व आरोग्य सेवा सुविधा कायद्याने बंधनकारक आहेत.
2) लघु उद्योगासाठी सरकार विविध योजना राबवते त्या आपण मिळवू शकतो.
3) विविध एनजीओ मध्ये सुद्धा ज्यांना सामाजिक कार्यात आवड आहे अशांना चांगल्या संधी आहेत.
यासह अजून बरेच मार्ग आहेत परंतु या सर्वांसाठी प्रथम शिक्षण घ्यावं लागतं. आपण समजू शकतो की अकरावी बारावी व पदवी-पदव्युत्तर ला आरक्षणानुसार मेरीट लिस्ट लागते. त्यानंतर प्रवेश होतो. त्यामुळे कदाचित आरक्षण वर्गीकरणाचे समर्थक म्हणु शकतात आमच्यापेक्षा प्रबळ असलेल्या समुहाने आमच्या जागा खाल्या म्हणून आमच्या मुलांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आमचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. परंतु राज्यात प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत व सक्तीचे आहे तरी मातंग समाजातील साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक आहे का? ते कोणत्याही आरक्षण वर्गीकरणाचे समर्थन करणार्या पुढार्याने सांगावे. याचे उत्तर नकारार्थीच असेल. त्यामुळे योग्य निदान करुन मगच योग्य उपचार करणे हा साधा नियम आम्ही समजून घेतला पाहिजे. मग तो आजार शारीरिक असो कि सामाजिक. अन्यथा आजार बळावत जावून ज्याप्रमाणे माणूस दगावू शकतो तसा समाज सुद्धा सामाजिक विकलांग होऊन या प्रगतीच्या स्पर्धेतून नामशेष होऊ शकतो. मग माणुस दगावल्यावर डॉक्टर ला दोष देऊन आणि समाज सामाजिक विकलांग होऊन प्रगतीच्या स्पर्धेतून नामशेष झाल्यावर नेत्यांना दोष देऊन काहीच साध्य होत नाही. तेव्हा हाती लागते ती केवळ निराशा. ती निराशा नको असेल तर आमच्या आशा पल्लवित करणारे संत रविदास,महात्मा फुले, क्रांतीगुरु लहुजी साळवे, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे समाज जोडणारे व समाजाला योग्य दिशा देणारे विचार आत्मसात करून अखंड अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करुयात. एकजुट होऊन या व्यवस्थेशी लढुयात. मनुवादी शक्तींचे विभाजनाचे मनसुबे धुळीत मिळवूया. बौद्ध-मातंग-चर्मकार-ढोर-भंगी व तमाम इतर समाजबांधव अनुसूचित जाती म्हणून एक राहुयात.
“थवा सोडू नका पाखरांनो
शिकारी गालात हसला आहे,
तुमची एकी बघूनच तर तो
आजवर शांत बसला आहे”
जय भीम… जय लहुजी… जय रविदास.. जय संविधान
— मंगेश गाडगे✍️





















