नांदेड दि.३ फेब्रुवारी: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचे हे एक विदारक उदाहरण आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी अडथळा ठरत असल्याने एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) हा मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी असून त्याचे बाऱ्हाळी येथे कटिंगचे दुकान आहे. त्याला एकूण तीन अपत्ये होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाचा उमेदवार म्हणून उभे राहण्याची पांडुरंगची इच्छा होती आणि त्याने त्यादृष्टीने तयारीही सुरू केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या आड आपलीच तिसरी मुलगी येत आहे, असा विचार करून त्याने हे भयानक पाऊल उचलले.
सुमारे तीन दिवसांपूर्वी आरोपी पांडुरंग याने साहित्याची खरेदी करण्यासाठी जात असल्याचे कारण पुढे करत पत्नीला सांगितले आणि आपल्या सात वर्षांच्या ‘प्राची’ या चिमुकलीला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तो मुलीला घेऊन शेजारील तेलंगणा राज्यात गेला. तिथे गेल्यावर त्याने बोधन रोडवरील कट्टापल्ली परिसरातील एका कालव्यात आपल्या पोटच्या गोळ्याला जिवंत फेकून दिले. यानंतर तो निर्धास्तपणे घरी एकटाच परतला.
दुसरीकडे, तेलंगणा राज्यातील कालव्यामध्ये एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस तपासात संशय बळावल्याने तेलंगणा पोलिसांनी तपास करत थेट नांदेड जिल्ह्यातील मुखेड गाठले. ३० जानेवारी रोजी पोलिसांनी पांडुरंग कोंडामंगले याला ताब्यात घेऊन अटक केली असता, या क्रूर कृत्याचा उलगडा झाला.
गावात सरपंच होण्याच्या स्वप्नापायी आणि केवळ तिसरे अपत्य निवडणुकीसाठी अपात्र ठरवेल या भीतीपोटी बापानेच मुलीचा काटा काढल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरुवातीला आर्थिक अडचणीतून हा प्रकार घडल्याची चर्चा होती, परंतु पोलीस तपासात आणि गावातील चर्चेतून निवडणुकीच्या कारणास्तव ही हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. या दुर्दैवी घटनेने समाजातील नैतिक अधःपतन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.













