पाटणा | बिहारमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका या नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बिहारमध्ये 245 पैकी 225 जागा एनडीएच्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शहा शनिवारी (29 मार्च) बिहार दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी भाजपचे कार्यालय प्रभारी विनोद तावडे, दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा, भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जैस्वाल, सर्व आमदार, आमदार, खासदार आणि राज्याचे अधिकारी यांची बैठक घेतली.(Bihar Election)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “एनडीएमध्ये पाच पक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्ह कोणतेही असो, एनडीएला विजयी करायचे आहे. बिहारमध्ये एवढा मोठा विजय व्हावा, हा संदेश संपूर्ण देशाला द्यायला हवा. पक्षात काही मतभेद असतील तर ते विसरून एकत्र या आणि एनडीएला विजयी करा.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाबाबत संभ्रमाची स्थिती स्पष्ट केली आहे. एनडीए आगामी विधानसभा निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक जिंकण्याचा मंत्र
निवडणुका जिंकण्याचा मंत्र पक्षश्रेष्ठींना देत अमित शहा म्हणाले की, “जी काही उणीव आहे, तिचे ताकदीत रूपांतर करावे लागेल. ज्या बूथवर आपण हरलो किंवा कमी मते मिळविली ते बूथ जिंकायचे आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ही रणनीती यशस्वी झाली. 6 एप्रिल रोजी पक्षाचा स्थापना दिवस आणि 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाईल.”
बिहारमध्ये 225 जागांचे लक्ष्य
बिहारमध्ये 243 पैकी 225 जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर ठेवले आहे. हे लक्ष्य कसे गाठायचे यावरही विचारमंथन झाले. यासोबतच एनडीए आक्रमक रणनीती घेऊन मैदानात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
बिहारमध्ये जंगलराज परत येऊ नये : शहा
गृहमंत्री म्हणाले की, “भाजप, जेडीयू, एलजेपी रामविलास, एचएएम, आरएलएम यांना पूर्णपणे एकत्र राहावे लागेल. बिहारमध्ये एनडीएचे हेच स्वरूप असेल. बिहारमध्ये स्थिर सरकार देण्यासाठी एनडीए कटिबद्ध आहे. जंगलराज येऊ नये यासाठी भाजप निर्धाराने काम करेल.”