नांदेड : प्रतिनिधी | नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. आता भाजप तथा महायुतीकडून अमर राजूरकर, उबाठा सेनेचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत इंगोले निवडणूक रिंगणात लढत देणार आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दि. ४ रोजी राष्ट्रवादीचे प्रविण पाटील चिखलीकर, काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगाव, रामदास सुमठाणकर या प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. यानंतर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे राजूरकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी २५ मे पासून अर्ज खरेदी व दाखल करण्यास सुरुवात झाली. १ जून रोजी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम कालावधीत काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर, महायुती तथा भाजपकडून अमरनाथ राजूरकर, राष्ट्रवादी प्रविण पाटील चिखलीकर, अपक्ष म्हणून काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर, कृष्णा नागेश पाटील, ज्योतिबा खराटे, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. २ जून रोजी या अर्जांची छाननी झाली असून सर्व ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यामुळे महायुतीत बिघाड होऊन ही निवडणूक अटीतटीची होईल असे वाटत होते. परंतु राज्यातील सत्तेमध्ये वाटेकरी असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व खेळ उलटला आहे. नांदेडमधील २ कट्टर राजकीय विरोधक भाजप खा. अशोकराव चव्हाण व राष्ट्रवादीचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असतांना सकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुतीची भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी एकत्र आहोत, असे सांगितले.
यानंतर दुपारी राष्ट्रवादी उमेदवार तथा आमदार पुत्र प्रविण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोबतच काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगाव, रामदास सुमठाणकर या प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे विधान परिषदेची ही लढत तिरंगी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण ८ मतदान केंद्रावर १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी करण्यात येणार आहे.