विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.२६ : सध्या दिवाळीमुळे बाजारपेठेत गर्दी वाढली असून, बाजारपेठ मध्यरात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पोलीस आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठ सुरू राहिली तर कायदा-सुव्यवस्थेचा ताण पोलीस प्रशासनावर येऊ शकतो. शिवाय अनुचित प्रकारही खरेदी करून घरी जाणाऱ्या ग्राहकांसोबत घडू शकतो. त्यामुळे व्यापाऱ्यांची ही मागणी योग्य की अयोग्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दिवाळीचा सण तोंडावर आल्याने बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. नवीन कपडे, गृहोपयोगी साहित्य, पात्रदाणे, सोने-चांदीसह मिठाई अशा विविध वस्तू खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी होत आहे. मात्र रात्री ११ वाजता दुकाने बंद करावी लागत असल्याने व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिवाळीनिमित्त बाजारपेठ मध्यरात्री बारापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मागितली आहे. निवेदन देताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, शिवशंकर स्वामी, अजय मंत्री, संतोष कावळे पाटील, जयंत देवळाणकर, सरदार हरिसिंग, युसूफ मुकाती आदी हजर होते.
कायदा-सुव्यवस्थेचे काय ?
सध्या निवडणूक असल्याने आधीच पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण आहे. शहर संवेदनशील आहे. त्यात नशेखोरांनी गेल्या काही दिवसांत उपद्व्याप वाढवले आहेत. हल्ले, चोऱ्या वाढल्या आहेत. बाजारपेठ १२ पर्यंत सुरू ठेवली तर ग्राहक तोपर्यंत गर्दी करतील. यातून कायदा – सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भावना सुज्ञांकडून व्यक्त होत आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!