नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) नवी दिल्लीत सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काय घडलं या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता आणि दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स पॉलिसी संदर्भातील सरकारची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत मांडण्यात आली. सरकारच्या वतीनं संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत सरकारनं काय पावलं उचलली याबाबतची माहिती देण्यात आली.
किरेन रिजिजू(Kiren Rijuju) यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर माहिती देताना म्हटलं की,गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये शांततेत लोक व्यापार करत होते, पर्यटक येत होते, सर्व चांगलं सुरु होतं.या घटनेमुळं वातावरण बिघडलं यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे विचार मांडले. दहशतवादाविरुद्ध भारताला एकजूट होऊन लढाई लढावी लागेल, हे सर्वांनी मान्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जे भाषण केलं ते सर्वांनी ऐकलं आहे. भारत दहशतवादावर कठोर प्रहार करण्यात आला तो यापुढं देखील केला जाईल, असं सरकारनं सांगितलं.
किरेन रिजिजू म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यांकडून, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग करण्यात आलं. घटना कशी झाली, चूक कुठं झाली हे सांगितलं. ज्या ठिकाणी घटना झाली ती जागा मुख्य रस्त्यावर नाही, पायी जावं लागतं, घोड्यावरुन जावं लागतं, दोन अडीच तास दूर ठिकाण आहे ती ही घटना झाली. सर्व पक्षांना सांगितलं की, सर्व चांगलं सुरु असताना ही घटना घडली, ही एक चूक झाली, सर्व जण दु:खी आहेत. यापुढं अशा घटना होऊ नये यासंदर्भातील ब्रिफींग करण्यात आलं.

सर्व राजकीय पक्षांनी सरकारसोबत आहेत, असं सांगितलं. दहशतवादाविरोधातील लढाईत सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत. सरकार जे पावलं उचलेल त्यांच्या सोबत असेल, असं राजकीय पक्षांनी सांगितल्याचं किरेन रिजिजू म्हणाले.
ही बैठक सकारात्मकतेनं संपली. दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढाई लढायची, हे यापुढं देखील कायम राहील. अशा घटनांच्या काळात एकमेकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, राजकारण करु नये, असं आवाहन केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या वातावरणात देश एकजूट राहिला पाहिजे हा संदेश दिला आहे.
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ, पाकिस्तान आणि ज्यांनी कुणी ही घटना घडवली आहे त्यांचा बदला घेणार आहोत. यासाठी एकजूट राहू आम्ही हे मानतो, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं.