अहिल्यानगर : राहुरी शहरात घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबना घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी सुरू असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांचे अन्नत्याग उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित झाले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आले असून आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात २६ मार्चला दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला २० दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्राचे पोलीस सक्षम असून एखादा आरोपी शोधणे त्यांच्यासाठी अवघड नाही. मागे एका मंत्र्यांचा मुलगा थायलंडला निघाला होता. मात्र पोलिसांनी, शासनाने ठरवले आणि विमानाचा मार्ग बदलून त्याला परत आणले. मात्र २० दिवस उलटूनही राहुरी शहरात पुतळा विटंबनेतील आरोपी सापडत नसेल तर त्याचा जाब विचारावाच लागेल. कोरटकर, सोलापूरकर यांची उदाहरणे समोर असल्याने राहुरी प्रकरणात देखील शंका उपस्थित होतेय. ४८ तपास घटनेचा तपास झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून इथल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. घटनेचा तपास लागला नाही, हा लढा महाराष्ट्रभर नेऊ, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
Satyaprabha News | Marathi News |